Breaking-newsपुणे
‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ची यशस्वी सांगता

पुणे – धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ची आज सांगता झाली.
गेल्या १७ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रबोधनामुळे खडकवासला परिसरात धुलिवंदन आणि रंगपंचमी या सणांमध्ये शिरलेल्या अपप्रकारांमध्ये घट होऊन धर्मशास्त्राविषयी समस्त हिंदु जागृत झाल्याचे चित्र दिसून आले. याचा परिणाम स्वरूप रंग खेळून पाण्यात उतरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या नगण्य होती. जलनिसर्गाचे अस्तित्व आणि कृपाशीर्वाद यामुळेच हे शक्य झाले. अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
अभियानात सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होत होते. खडकवासला येथील ग्रामस्थ, प्रशासन, पोलीस खाते यांचा पाठिंबा, तसेच नागरिक, विद्यार्थी यांचा अभियानात उत्स्फूर्त सहभाग असल्याने अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. त्यासह कमिन्स इंडिया आस्थापनांचे ६० हून अधिक कर्मचारी, सनातन संस्था, रणरागिणी शाखा यांच्या सहभागाने अभियानाची यशस्वी सांगता झाली.
सावरकर प्रतिष्ठानचे विद्याधर नारगोलकर, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते विलास मते, सनातन संस्थेचे विठ्ठल जाधव, रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर हे मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी आणि हिंदू सणांच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या अभियानाचे नागरिक, प्रशासन अशा सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन, जतन आणि पर्यावरण रक्षण यासाठी हिंदु जनजागृती समितीचा मोठा वाटा आहे, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.





