ऊस गाळप हंगाम लांबणीवर?
मुंबई : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने १५ ऑक्टोबरपासून सुरू होणारा ऊस गाळप हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हंगाम सुरू होण्यास दोन-तीन दिवस शिल्लक असतानाही केवळ ३४ साखर कारखान्यांनीच गाळप परवाना घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने पंधरा दिवस विलंबाने सुरू होण्याची शक्यता सहकार विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.
राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. यंदाच्या हंगामासाठी सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर ऊस लागवड असून, सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे २०३ कारखान्यांनी गाळपाची तयारी सुरू केली आहे. मात्र, राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगली भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या माघारीनंतरच गाळप सुरू करण्याची भूमिका काही कारखानदारांनी घेतली आहे. परिणामी आतापर्यंत २०३ पैकी २४ खासगी आणि १० सहकारी अशा ३४ साखरम् कारखान्यांनी साखर आयुक्तांकडून गाळप परवाना घेतला आहे. त्यातच गेल्या हंगामात गाळप केलेल्या ऊसापोटी प्रति टन तीन रूपये याप्रमाणे ऊस कामगार मंडळाला पैसे जमा केल्याशिवाय गाळप परवाना न देण्याची भूमिका साखर आयुक्तालयाने घेतली आहे. कारखानदारांनी आयुक्तालयाकडे पाठ फिरविल्याने यंदाचा हंगाम रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.