ताज्या घडामोडीमुंबई

औरंगाबादची सभा आणि अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी करा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये होणारी सभा, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आणि बेकायदेशीर भोंग्यांवरुन सरकारला ३ मे पर्यंत दिलेला अल्टिमेटम या विषयांवर चर्चा झाली. औरंगाबादची सभा आणि अयोध्या दौऱ्याची जंगी तयारी करा, अशी सूचना राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. शिवतीर्थावरील गुडी पाडव्याच्या सभेत तसंच ठाण्याच्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी जहाल हिंदुत्वाचं दर्शन घडवलं. त्याच दृष्टीने मनसेची सध्या वाटचाल सुरु आहे, मग ती बेकायदेशीर भोंग्याविरोधात उठवलेला आवाज असो वा हनुमान चालिसा, महाआरती असो… राज ठाकरेंचं रेल्वेइंजिन हिंदुत्वाच्या रुळावर धावत आहे. येत्या ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत.

मनसेची महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीचा तपशील जाहीर केला. महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये होणारी सभा, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आणि बेकायदेशीर भोंगे याविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच राज ठाकरेंच्या सुरक्षेच्या संदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

औरंगाबादच्या सभेची आणि अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करा

राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये सभा पार पडणार आहे. तसंच ५ जून रोजी ते अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. या दोन्ही कार्यक्रमांची जोरदार तयारी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. अयोध्या दौऱ्यासाठी मनसे 10 ते 12 रेल्वे आरक्षित करणार आहे. तसेच अयोध्या दौऱ्यासाठी विशेष रेल्वेच्या मागणीसाठी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंना पत्र लिहल्याची माहिती बाळा नांदगावकरांनी दिली.

गृहमंत्री वळसे पाटलांना पत्र लिहिलंय, अमित शहांनाही पत्र लिहिणार

राज ठाकरे यांनी बेकायदेशीर भोंग्याविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांनी धमक्या येत आहेत. पीएफआय सारख्या संघटनेने त्यांना धमकी दिली आहे. राज यांना येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासंबंधी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं. तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांना देखील पत्र लिहिणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button