‘RSS नं मोदींना आताच हिमालयात पाठवावं, देशाचं भलं होईल’; प्रकाश आंबेडकर यांची टीका
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ अर्थात आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदींना दोन वर्षांनी हिमालयात कशाला पाठवताय, त्यांना आताच हिमालयात पाठवा. देशाचं खूप भलं होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते बीडमध्ये एका सभेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा सत्ता येणार आणि ते फक्त दोन वर्षे पंतप्रधान राहणार, त्यानंतर ते साधू बनून हिमालयात निघून जातील, असा प्रचार सुरू आहे. माझं आरएसएसवाल्यांना आवाहन आहे, तुम्ही दोन वर्षांनी कशाला पाठवताय, तुम्ही आताच मोदींना हिमालयात पाठवून द्या. या देशाचं फार मोठं भलं होईल. आगामी काळात नरेंद्र मोदी विरोधी पक्षांना ‘बापात बाप आणि लेकात लेक’ ठेवणार नाहीत, अशी अवस्था करतील.
हेही वाचा – विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केली नवीन योजना
काँग्रेसला प्रेम (युती या अर्थाने) करण्यासाठी मोदींची परवानगी लागते. त्यांनी परवागनी दिली तरच ते आपल्याशी प्रेम करतील. मोदींनी परवानगी दिली नाही तर ते त्यांच्या मार्गाने आपण आपल्या मार्गाने. उद्या कदाचित आपल्याला आपला मार्ग निवडावा लागणार. कोणतंही युद्ध जिंकायचं असेल तर ते आधी डोक्यात जिंकायचं असतं. उद्याची लढाई आपल्याला जिंकायची असेल, त्यासाठी आरखडा तयार करावा लागेल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.