#Politics: मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवा; अन्यथा महाराष्ट्र माफ करणार नाही: खासदार संजय काकडे (व्हीडिओ)
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
श्री. उद्धव ठाकरे साहेब यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की, जाणार याची महाराष्ट्रात सध्या सर्वदूर खूप चर्चा आहे. मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार माननीय राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली नाही तर, महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही. आता याकामी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढाकार घ्यावा. याबरोबरच राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या चुका काढण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना या कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असं माझं प्रामाणिक मत आहे, अशी भूमिका राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केली आहे.
खासदार काकडे यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्धव ठाकरे साहेब यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस मंत्रिमंडळाने केली. त्याला 13 दिवस होऊनही राज्यपालांनी याविषयी निर्णय घेतला नाही. यामुळे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना ठराविक कालावधीत विधिमंडळाचे सदस्य होण्यात पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. असे होणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे याप्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यपालांशी चर्चा करून उद्धव ठाकरे साहेब यांच्या विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य बनण्याचा पेच सोडवावा. असे झाले तर, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ही गोष्ट सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. आणि जर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी विधानपरिषदेवर नियुक्त न केल्यास महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांनी क्षत्रियासारखी विरोधकाची भूमिका बजविण्याची ही वेळ आहे.
जगाच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे. आणि याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावे लागेल. देशात पहिल्यांदा ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केला. महाराष्ट्राबरोबरच देशात कोरोनामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जीवितहानीसह आर्थिक नुकसान होत असताना विरोधी पक्षांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहकार्य केले पाहिजे. आणि ही आपली खरी संस्कृती आहे, असेही खासदार काकडे यांनी म्हटले आहे.