धनंजय मुंडे राजीनामा देणार का? अजित पवार स्पष्टच बोलले..

Ajit Pawar | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिककराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. धनंजय मुंडे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का? हे विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.
अजित पवार म्हणाले, की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा.. असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीने दोषींवर कारवाई करत आहेत. मी इतकं स्पष्ट सांगतो, सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती आहेत. मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून कधीही जाती-पातीचा, नात्या-गोत्याचा विचार केलेला नाही. महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे, कायदा-सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, प्रत्येकाने आपआपली जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण आहेत? कसे वागतात? कसे बोलतात. लोकांशी कसे संबंध ठेवतात. याचं पण भान आमच्यासहीत सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा’; शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका दाखल केल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कोणत्या गुन्ह्यात मकोका दाखल केला, याची मला माहिती नाही. पण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे सहभागी असतील त्यातील कुणालाच सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे इतर आता कुणाच्या मागण्यांना काही अर्थ नाही. एसआयटीने नियमाप्रमाणे कडी जोडलेली आहे.





