पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय हालचालींना जोर; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

पिंपरी | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोल्हापूरनंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे एकत्रीकरण अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या शहराध्यक्षांनी या घडामोडींवर मत व्यक्त केले आहे.
अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी म्हटलं की, छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ असा राजकारणात विषय नसतो, परंतु आता आदरणीय शरद पवार मोठे आहेत. अनुभवाने देखील मोठे आहेत, तशा प्रकारचा आदेश करणे तो त्यांचा अधिकार आहे. दोन्ही पक्ष एकत्र आले तर आनंदच आहे. असं होत असताना कोणाच्या वाटेला काय यावं किंवा कोणी किती कोणत्या वाटेवर समाधान करावा हा मात्र अजितदादांचा आणि आदरणीय शरद पवार साहेबांचा अधिकार आहे. सर्वांना ज्ञात आहे अजित पवार महापालिकेमध्ये सर्व लक्ष घालतात, पहिल्यापासून 92 पासून त्यांचंच लक्ष आहे, त्यामुळे इकडचे तिकीट वाटपापासून सगळे निर्णय अजितदादाच घेत होते, सगळे निर्णय अजित दादांना घ्यायचे अधिकार शरद पवारांनी दिले होते, त्यामुळे 36 जागा असल्या तरी तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेला दोन राष्ट्रवादी झाल्या तेव्हा राष्ट्रवादी पक्षातनं केवळ दोनच नगरसेवक त्या ठिकाणी त्या गटाकडे गेले, किंवा त्यावेळेला समजा राष्ट्रवादी एक होती, परंतु विभाजन होत असताना 34 नगरसेवक इकडं राहिले आणि मात्र 2 शरद पवारांकडे गेले, त्यामुळे उजवी बाजू अजित पवारांची आहे, परंतु शेवटी त्यांच्या घरातला प्रश्न आहे आणि घरातला प्रश्न असल्यामुळे दोघं नेते एकत्र बसून जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण बघूया पुढे काय होते.
हेही वाचा : निवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न
जागे संदर्भात तिढा निर्माण व्हायचा काही संबंध नाही. कारण अजित पवारांकडचा गट मोठा आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे 1992 पासून 2017 पर्यंत अजित पवार सर्व पाहत होते, शरद पवार कधीतरी येत असत, मात्र अजित पवारांचा संपर्क कायम आहे त्यांच्या संपर्कात सर्व आजी माजी नगरसेवक आहेत, त्यामुळे अर्थातच जागा वाटणी होईल किंवा मागणी होईल त्यामध्ये अजित पवार वयाने लहान असले तरी पाठबळ त्यांच्या मागे जास्त आहे जास्त संख्येची मागणी आमच्याकडून होऊ शकते. कुठल्या घटक पक्षाला सोबत घ्यावं आणि नाही घ्यावं हा अधिकार अजितदादांचा आहे, त्यामुळे कोणत्या पक्षासोबत जायचं किंवा जायचं नाही, तसं काही आमच्या कानावर आजपर्यंत आलं नाही, अजितदादांनी तशी काही चर्चा केलेली नाही, असंही योगेश बहल यांनी म्हटलं आहे.
शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले की, पिंपरी चिंचवड हे शहर शरद पवारांच्या विचारांचे शहर आहे, जवळपास साडेचार लाख मतदान आहे, म्हणजेच हे शहर शरद पवारांच्या विचारांचे आहे. म्हणूनच आम्हाला जागा वाटपामध्ये मोठ्या भावाची भूमिका घ्यावी लागेल आणि त्यांनाही द्यावी लागेल, त्या पद्धतीने आमच्या जागावाटप होईल. मी त्या दिवशी सांगितलं होतं आणि आजही सांगतो महाविकास आघाडीमध्ये आमचा एक पाऊल मागे असेल, त्यामध्ये दादांचा स्वागत असेल, त्यावेळी आम्ही जागा वाटपामध्ये कमीपणा घेऊ पण आम्ही शहरांमध्ये आज सर्वे केलेला आहे, तसेच इतर पक्षांनीही केलेला आहे त्यामध्ये नक्कीच त्यांनाही समजलं असेल कुठल्या पक्षाला लोकांची पसंती जास्त आहे, त्या अनुषंगाने आम्ही जागेचे मागणी करत आहोत. 2017 मध्ये जे नगरसेवक निवडून आले होते ते शरद पवार यांच्या विचाराकडे पाहून लोकांनी मतदान केलं होतं म्हणून निवडून आले होते, वैयक्तिक कोणाकडे पाहून मतदान केलं नव्हतं. ती ताकत शरद पवारांची होती आजही आमच्या विचारांची लोकं तिथे आहेत, असंही ते म्हणालेत.





