उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्रिमंडळ झाले, रडारड सुरुच,कोणी कितीही आपटली व अश्रू ढाळले ...
महाराष्ट्र : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष खातेवाटपाकडे लागले आहे. यावरुन सध्या महायुतीत अनेक बैठकाही होत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार असा प्रश्न सतत विचारला जात आहे. सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता आजच्या सामना अग्रलेखातून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रिमंडळ झाले, रडारड सुरुच, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली. मंत्रिमंडळ झाले, रडारड सुरुच अशा मथळ्याखाली शिवसेनेचा आजचा अग्रलेख पाहायला मिळत आहे. राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ अखेर बनले, पण रडारड संपलेली नाही.
नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही. कोणी कितीही आपटली व अश्रू ढाळले तरी ईव्हीएम बहुमताच्या जोरावर सरकार मजबूत आहे. त्यामुळे नवीन मंत्री सध्या बिनखात्याचे असले तरी कारभार रेटून नेला जाईल. भविष्यात शिंदे व अजित पवार निस्तेज होतील आणि काही आदळआपट करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात ‘ईडी’च्या चौक्या कायमच्या लावल्या जातील! महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण या पद्धतीने!, असे अग्रलेखात म्हटले आहे.





