“ही तर सरळ सरळ हत्याच!” पुणे विषारी दारू प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक; ८ आरोपींना अटक

Devendra Fadnavis | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या १४ नागरिकांच्या संशयास्पद मृत्यूची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. “हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून हा एक प्रकारे हत्येचाच प्रकार आहे. यातील दोषींवर अत्यंत कडक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली असून, या रॅकेटमधील आणखी काही जणांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या ४८ तासांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात संशयास्पद मृत्यू झालेल्यांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील ९, तर पुण्यातील हडपसर परिसरातील ५ नागरिकांचा समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार, ही दारू तयार करण्यासाठी ‘मिथेनॉल’ सारख्या अत्यंत घातक आणि विषारी रासायनिक पदार्थाचा वापर करण्यात आला होता. यावर पोलीस अधिक तपास करत असून वैद्यकीय अहवालानंतर चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा
समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी; महापौर रवि लांडगे
माझं पोलिस आयुक्तांशी बोलणं झालं आहे. कोणत्या ठिकाणी हे तयार झालं हे देखील त्यांनी शोधून काढले आहे. या प्रकरणातील संशयितांनी अटक करण्यात आली आहे. अजून काही जणांचा यात समावेश असू शकतो, त्याचाही शोध घेण्याचे काम सुरु आहे. गंभीर असलेल्यांना योग्य उपचार देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आठ लोकांना अटक झाली असून, आणखी काही जणांना अटक होऊ शकते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दोषींवर कडक कारवाई केली जाईल. ही एक प्रकारे हत्याच असून, अतिशय गंभीर कलमं देखील त्यांच्यावर लावण्यात आली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विषारी मद्यामध्ये मिथेनॉससारखा पदार्थ मिक्स केल्याबाबत प्रश्न विचारला असता, मिथेनॉल सारखाच पदार्थ आहे, पोलिस यावर अधिक माहिती देतील, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले.





