कुडाळच्या रणांगणात ‘तुतारी’चा कडकडाट; शशिकांत शिंदेंचे शिलेदार मैदानात!
गावभेट दौऱ्यात पूनम नायकुडे आणि राजेंद्र शिंदे यांचा प्रचारात धडाका; जनसंपर्काच्या जोरावर विरोधकांचे धाबे दणाणले

सातारा (प्रतिनिधी) :
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २०२६ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, जावळी तालुक्यातील कुडाळ गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाकडून जिल्हा परिषदेसाठी सौ. पूनम प्रशांत नायकुडे आणि पंचायत समितीसाठी श्री. राजेंद्र रामचंद्र शिंदे यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. ‘तुतारी’च्या या आवाजाने विरोधकांच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरल्याचे चित्र दिसत आहे.
अनुभव आणि जनसंपर्क हीच मोठी ‘शिदोरी’
पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र शिंदे (काका) यांची प्रतिमा एक अभ्यासू आणि लोकाभिमुख नेता अशी आहे. मेढा येथे मुद्रांक विक्रेता म्हणून काम करताना त्यांनी निर्माण केलेला दांडगा जनसंपर्क आणि कुडाळ विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन म्हणून केलेले कार्य ही त्यांची मोठी ताकद ठरत आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून लाभलेला प्रशासकीय अनुभव निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.
हेही वाचा – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने शिक्षणक्षेत्राला मोठा धक्का
घरोघरी पोहोचण्यावर भर; शांत पण प्रभावी प्रचार
पक्षाच्या आदेशानुसार, कोणताही बडेजाव किंवा ‘धांगडधिंगा’ न करता, अत्यंत संयमित पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. राजेंद्र शिंदे प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन संवाद साधत आहेत. या ‘डोअर टू डोअर’ कॅम्पेनमुळे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या कामाचा धबधबा विरोधकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
महिला सक्षमीकरण आणि विकासकामांचा अजेंडा
प्रचारादरम्यान राजेंद्र शिंदे यांनी प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या प्रश्नांना हात घातला आहे. “बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार मिळवून देणे ही आपली प्राथमिकता असेल,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यासोबतच:
गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे. वीज समस्या आणि अंतर्गत रस्ते सुधारणे. प्रशासकीय अनुभवातून गावचा सर्वांगीण विकास साधणे. ”आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेऊन कामावर लक्ष केंद्रित करत आहोत. जनतेचा मिळणारा आशीर्वाद पाहता, कुडाळ गटात तुतारीचा विजय निश्चित आहे,” असा विश्वास यावेळी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला.




