पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का?
आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत, असा पुर्नच्चार संजय राऊतांनी केला.

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये जर महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल कौटुंबिक भांडणासारख्या क्षुल्लक गोष्टी मी विसरुन जाईन असे म्हटले होते. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरु झाली. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत, असा पुर्नच्चार संजय राऊतांनी केला.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे-ठाकरे गटाच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे त्यांचे मत मांडले. जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत, ते ठाकरे आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावर जर त्यांची सहमती होते, तर त्यात फार वादविवाद करणं योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – ‘दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आनंदच, आम्ही त्याचं स्वागत करु’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संजय राऊत काय म्हणाले?
काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात. त्यामुळे हे असे काटे मारत असतात. राज ठाकरेंनी एक विषय मांडला. तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा. त्यावर काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिसाद दिला. तो प्रतिसादही महाराष्ट्राच्या हितासाठी होता. यामध्ये अटीशर्थी कुठे आल्या. कोणती अट, कोणती शर्त. जर दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत, ते ठाकरे आहेत. ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावर जर त्यांची सहमती होते, तर त्यात फार वादविवाद करणं योग्य नाही. यामताचा माझ्यासारखा माणूसही आहे. त्यात अट आणि शर्त आहे कुठे, कोणतीच नाही. एकही अट-शर्त कोणीही टाकलेली नाही. राज ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी… प्रश्न इतकाच आहे की या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसत नाही. ही अट नाही लोकभावना आहे. याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचे आहे आणि विशेषत: महाराष्ट्राच्या भावनेचा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले.