बारामती लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा; सप्रिया सुळे म्हणाल्या..
![Supriya Sule said that any party has the right to contest elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Supriya-Sule-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या चार जागा आपण लढवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्रातील नागरिक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी मनापासून याचं स्वागत करते, कारण ही लोकशाही आहे.
हेही वाचा – IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चुरशीची लढत! पाहा कधी अन् कुठे होणार सामना
आमची नाती एका जागेवर आहेत आणि राजकारण वेगळं आहे. प्रोफेशन आणि नात्यात कधीच गल्लत करायची नसते. मी लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा केली आहे. लोकशाहीत कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. यात काहीही गैर नाही. माझ्याविरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे, हा माझा आग्रह राहिला आहे. बाकी महाराष्ट्र आणि बारामतीतील मायबाप जनता ठरवेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कुटुंबातील व्यक्तीच लोकसभा निवडणुकीला तुमच्याविरोधात उभे राहिलं तर काय करणार? असा प्रश्न विचारता सुप्रिया सुळेंनी म्हणाल्या की, मी लोकप्रतिनिधी आहे. मी लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आली आहे. ही लढाई नाही आहे. दोन वेगळे विचार आहेत. लोकसेवा आपला विचार असेल, तर लढाई वगैरे काही नसतं.