‘राज्यातील निकाल हे अनाकलनीय’,प्रसिद्ध वकील असिम सरोदे
वकील असिम सरोदे यांची पोस्ट , विधानसभा निकाला विरोधात न्यायलयात जावं का?

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. तर सर्वाधिक जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर शिवसेना शिंदे गट 57 जागांवर विजयी झाली आहे. 41 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर विजयी झाली आहे. तर अपक्ष 12 उमेदवार निवडून आले आहेत. अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला. यावर अॅड. असीम सरोदे यांनी एक पोस्ट लिहिली आहे.
राज्यातील निकाल हे अनाकलनीय असल्याचं असीम सरोदे म्हणालेत. अनेकांचे फोन आले. की या निकाला विरोधात न्यायलयात जावं का? पण त्यासाठी पुराव्यांची आवश्यकता असते. त्याबद्दल मी फेसबुक लाईव्ह करणार आहे, असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. मध्यंतरीच्या काळात असीम सरोदे यांनी अनेक ठिकाणी ‘निर्भय बनो’ अंतर्गत सभा घेतल्या होत्या.
असीम सरोदे यांची फेसबुक पोस्ट
अनेक जण जे निवडणुकीत हरले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. मी आज अश्या अनेकांच्या फोन कॉल्स ला उत्तरे दिलीत. निवडणूक याचिका करतांना नेमके आक्षेप, प्राथमिक पुरावे आवश्यक असतात. केवळ भावनाशील होऊन हायकोर्टमध्ये चांगली पिटिशन होऊ शकत नाही.
मी उद्या शक्य झाल्यास याबाबत फेसबुक लाईव्ह करून निवडणूक याचिका करण्यासाठी आवश्यक माहिती देणार आहे. निवडणुकीला आव्हान देण्याचा हक्क केवळ हरलेल्या उमेदवारांना नाही तर कुणी त्या मतदार संघातील उमेदवार सुद्धा अशी याचिका करू शकतात. निवडणूक निकाल अनाकलनीय लागले हे तर अगदी महायुतीतील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना माहिती आहे. आधी सुद्धा निवडणूका व्हायचे व लोक पराभूत व्हायचे पण निवडून आलेल्या व विजयी झालेल्या उमेदवारांच्या बाबत इतक्या शंका कधी नसायच्या. फ्री अँड फेअर निवडणूक प्रक्रियेसमोर विश्वासहार्यतेचे मोठे आव्हान आहे.