शरद पवारांच्या भूमिकेने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित; म्हणाले…
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते तीन दिवसांपासून वाय. बी. सेंटर परिसरात बसून होते. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षातील समितीने तीन दिवसात आपला निर्णय जाहीर करू, असे सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी (ता. ५) शरद पवार (Sharad Pawar) यांनी वाय.बी. सेंटर परिसरात येत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांच्यासाठी रक्ताने लिहिलेले पत्रही पवार यांना देण्यात आले. तसेच पवारांनी आपला निर्णय मागे घेतला नाही तर ६ मेपासून आमरण उपोषण करण्याचाही इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता.
पवारांनी यावेळी आपण अध्यक्ष पद सोडण्याचा का निर्णय घेतला याबाबत सांगितले. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याचा विचार करूनच मी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाबाबत मी तुमच्याशी चर्चा करायला हवी होती. मात्र तुम्ही नकारच दिला असता, याची मला कल्पना होती. त्यामुळे मी हा निर्णय स्वतः घेतला.”
यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांचा विचार करून दोन दिवसात अंतिम निर्णय जाहीर करू, असे सांगितले. पवार म्हणाले, “माझ्या निर्णयानंतर राज्यभरातून अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनांचा मला आदर आहे. राज्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या तीव्र भावानांचा विचार करून मी दोन दिवसात अंतिम निर्णय जाहीर करतो. त्यानतंर कुणालाही वाय. बी. सेंटरवर उपोषणाला बसावे लागणार नाही.”
पवारांनी दोन दिवसानंतर कुणालाही वाय.बी. सेटंरवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे आश्वस्त केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून पवारांच्या निर्णयाचे स्वागत केले.





