पार्थवर गुन्हा का नाही, हे मुख्यमंत्रीच सांगतिल; शरद पवारांचे वक्तव्य चर्चेत

Sharad Pawar | पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत आले आहेत. पार्थ यांच्या ‘अमेडिया’ कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण राजकीयदृष्ट्या अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ पवार प्रकरणात राज्य सरकार त्यांना वाचवत आहे का? असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारने यावर चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालातून कोणत्या बाबी समोर येतात, ते पाहिले पाहिजे.
हेही वाचा : माझा साखरपुडा मोडला… यात एवढं काय? अभिनेत्री रवीना टंडनचा सवाल
अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न झाला आहे का? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण हा गंभीर विषय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जर मुख्यमंत्रीच हा गंभीर विषय असल्याचे सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून त्याचे वास्तव चित्र समाजासमोर ठेवले पाहिजे.
कुटुंब प्रमुख म्हणून या प्रकरणाकडे तुम्ही कसे पाहता? असे विचारले असता शरद पवार म्हणाले, प्रशासन, राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर आमची विचारधारा आणतो, असंही शरद पवार म्हणाले.





