कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले..

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकजवळच्या चांदवड या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी पहिल्यांदाच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
शरद पवार म्हणाले, तुम्ही सगळे कष्ट करतायत, पण सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही. ज्यांच्या हातात धोरणं ठरविण्याचे अधिकार आहेत, त्यांना जाणं नसेल तर शेतकरी उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. मी मागे मनमाडला आलो होतो, तेव्हा मला काही शेतकऱ्यांनी सांगितले की, कांदा संदर्भात काही निर्णय केंद्र सरकार घेत आहे. त्यामुळे मी कार्यक्रम थांबवून तत्काळ दिल्लीला गेलो. त्यावेळी, भाजपचे लोकं कांद्याच्या माळ गळ्यात घालून आले होते. याबाबत अध्यक्षांना विचारल्यावर कांद्याचे भाव खूप वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कांद्याचे दर कमी करता येणार नाही का? असे मला अध्यक्षांनी विचारले. त्यावर, दोन पैसे शेतकऱ्यांना मिळत असतील तर मिळू द्या असे मी त्यांना सांगितले.
हेही वाचा – विचार कोणाताही असो; देश अन् महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे!
सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखणारे नाहीत. २६ तारखेला प्रचंड अवकाळी गारपीट झाली. द्राक्ष बागेचे प्रचंड नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष देशभरात जातात, पण द्राक्ष मालावर बांगलादेशने ड्युटी बसवली, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. देशात साखर कारखान्याच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऊसापासून आपण रस काढतो, साखर काढतो आणि इथेनॉल तयार करतो. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने निर्णय घेतला, ज्यात इथॉनल आणि रसावर बंदी आणण्यात आली. शेतकरी हिताचे निर्णय कधी घेतले जात नाही.त्यामुळे, आज जो कार्यक्रम तुम्ही केला, यातून केंद्र सरकारने संदेश घ्यावा. मी उद्या संसदेत जाणार आहे, संबधीत लोकांना भेटणार. त्यातून काही हाती आले नाही तर तुम्ही तयार रहा, असं शरद पवार म्हणाले.
पिके नष्ट झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. पण कृषीमंत्री शेताच्या बांधावर फिरकायला तयार नाही, असं शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मश्किल टिप्पणी केली. त्याचं उत्तर मी काय देणार? एक काळ असा होता की, त्यांच्या बद्दल निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला होता. पण ते आम्हाला सोडून गायब झाले. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.





