‘मुख्यमंत्री करा म्हणत ते दारोदारी भटकत आहेत’; एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde | महायुतीच्या मेळाव्यात माजी खासदार निलेश राणे यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. आमच्यावर टीका करणारे आज मला मुख्यमंत्री करा करा म्हणत दारोदारी भटकत आहेत, मात्र यांचा चेहरा मित्रपक्षांना चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल असे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निलेश राणे हे शिवसेनेत आले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच मी नारायण राणे यांनाही धन्यवाद देईन की त्यांनी निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी होकार आणि संमती दिली. निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आता कुडाळ मालवण या ठिकाणी शिवसेना म्हणजेच महायुतीची ताकद वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना कुडाळमधून २६ हजार मतांचा लीड होता. मला विश्वास वाटतो आहे की निलेश राणे यांना ५२ हजारांचा लीड मिळेल.
हेही वाचा – कोपरी-पाचपाखाडीत शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे रिंगणात!
२०१९ ला महायुतीला मतदान झालं होतं. एकनाथ शिंदेने तेव्हा धाडस केलं आणि राज्यात महायुतीचं सरकार आणलं. आम्ही सरकारमध्ये होतो तरीही विरुद्ध दिशेने गेलो कारण बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी सोडले त्यांच्याबरोबर आम्ही राहिलो नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्याने बेईमानी केली त्याचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव करणाऱ्या काँग्रेससमोर ज्यानी गुडघे टेकले त्याचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले आहेत. तसंच कोकणाच्या विकासात ज्यांनी कायम खोडा घातला त्यांना धडा शिकवायचा आहे. हे विसरु नका, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेना वाचवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मी उठाव केला आणि त्याला ५० आमदारांनी साथ दिली आजही ते सर्व आमदार माझ्यासोबत असल्याचा सार्थ अभिमान आहे. आमच्यावर टीका करणारे आज मला मुख्यमंत्री करा करा म्हणत दारोदारी भटकत आहेत, मात्र यांचा चेहरा मित्रपक्षांना चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल असे मत व्यक्त केलं. आम्ही शिवसेना सोडली नाही तर ती बरोबर नेली, धनुष्यबाण वाचवला. बाळासाहेब असताना सगळे लोक मातोश्रीवर यायचे. आज दिल्लीतल्या गल्ल्यांमध्ये फिरावं लागतं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.





