‘..तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते’; शहाजीबापू पाटलांचं वक्तव्य चर्चेत

Shahajibapu Patil | २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असते, असे वक्तव्य शिवसेनेचे (शिंदे गट) नेते व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. मागच्या वेळेस मी निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे अडीच वर्षे आणि एकनाथ शिंदे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले होते, असेही शहाजीबापू पाटील म्हणाले. ते सांगोल्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
शहाजीबापू पाटील म्हणाले, की मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. १९९५ ला मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलो. तेव्हा उद्धव ठाकरे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी उठाव केला आणि एकनाथ शिंदे अडीच वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
हेही वाचा : सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता; पंतप्रधान नरेंद्र मोदी
माझी रास ही शिवसेनेची आहे, तरीदेखील मी कसा काय काँग्रेसकडे गेलो मला माहिती नाही. मी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा घेऊन उतरलो आणि जिंकलो आहे, असंही शहाजीबापू पाटील म्हणाले.