माणसापेक्षा खुर्ची महत्वाची; उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातच नाही तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार अशा चर्चा सुरू असतानाच आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याबाबत वेगाने घडामोडी घडत असताना संजय शिरसाट यांनी यासह विविध विषयांवर पत्रकार परिषदेत भाष्य केले.
संजय शिरसाट म्हणाले, की गेल्या दोन दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता, राजकारणात माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची आहे असं दिसतंय. माणसापेक्षा खुर्ची जिंकली आहे. सार्वजनिक जीवनात खुर्ची जिंकली आणि माणूस हरला आहे. सर्वसामान्य लोकांना या गोष्टी भावत नाहीत. तीन दिवसांचा शासकीय दुखवटा सुरु असताना हे होतंय. थोडा कालावधी जायला हवा होता.
हेही वाचा : भावनांसह निर्माण होणारे संगीत हृदयापर्यंत पोहचते..; पद्मविभूषण इलायाराजा
अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो होते. त्यांच्या निर्णयाविरोधात जाण्याची त्यांना क्रॉस करण्याची ताकद कोणत्याही नेत्यात नव्हती. शरद पवार किंवा इतर नेत्यांशी अजित पवारांच्या झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला असता तर, तो सर्वांनी मान्यही केला असता. पण आता परिस्थिती बदलली आहे. सामूहीक निर्णयाचे वारे आता राजकारणात चालेल म्हणून कदाचित शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या प्रक्रियेत खंड पडेल अशी शंका व्यक्त केली आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत शरद पवारांना विचारलं गेलं नसावं. त्यांच्या पक्षाचे राजकीय सल्लागार आणि नेते यांनीच ठरवून हा निर्णय घेतला असावा. पवारांना याबाबत किती माहिती आहे याबाबत आता सांगणे शक्यही नाही. राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा पवार कुटुंबातीलच होईल हे जवळपास निश्चित आहे. भाजपा किंवा आम्ही (शिवसेना) राष्ट्रवादीच्या भूमिकेला समर्थन देणार आहोत, असेही शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले.




