चाकणकरांसह अनेक मंत्री खरातच्या संपर्कात; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई | महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कॅप्टन अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी (ता. २०) आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप केले. चाकणकरांसोबतच राज्यातील अनेक मंत्री आणि मोठे नेते भोंदूबाबा अशोक खरात यांच्या संपर्कात होते आणि त्याच्या सल्ल्यानुसार काम करत होते, असा दावा त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना शिक्षण विभागातील अनेक महत्त्वाच्या बदल्या आणि बढत्या भोंदूबाबा अशोक खरात यांच्या सल्ल्यानुसार केल्या जात होत्या. ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून ही कामे करून घेतली जात होती. त्या काळात शिक्षण खाते खरात चालवत होते. हिंदुत्वाच्या नावाखाली भोंदूगिरी सुरू आहे. विनायक दामोदर सावरकरांना अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी मान्य नव्हती; हे हिंदुत्व नाही. अशा प्रकारे अंधश्रद्धेने काम करणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी.
हेही वाचा : अभय योजनेला पिंपरी-चिंचवडकरांचा प्रतिसाद; २० दिवसांत ८० कोटींची कर वसुली

दीपक केसरकर, एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे खरातचा सल्ला घेत होते. सध्याच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्री त्या बाबाचा सल्ला घेत होते. केसरकर शिक्षणमंत्री असताना त्यांचे खाते भोंदूबाबा चालवत होते, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथविण्यासाठी काही विधी चालू होते, असा धक्कादायक आरोपही राऊत यांनी केला.





