अमित शाहांच्या वक्तव्यावर आम्ही हसतोय; संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई | घरात मातृभाषेमधून बोललं पाहिजे असं आवाहन करत बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं अशी मागणी करण्यांमध्ये मी देखील होतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. यावरून आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. बॉम्बेचं मुंबई करण्यात अमित शाहांचं योगदान असेल, तर आम्ही काय त्यावेळी गोट्या खेळत होतो का? अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
खासदार संजय राऊत म्हणाले, बॉम्बेचं मुंबईत करण्यात माझं योगदान आहे, असं अमित शाह म्हणत असतील, तर मग आम्ही काय त्यावेळी गोट्या खेळत होतो का? बॉम्बेचं मुंबई व्हावं, मुंबईतील दुकांनांवरील पाट्या मराठीत व्हाव्या, यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही मोठं आंदोलन केलं होतं. राम नाईक, पीबी सांमत यासारख्या नेत्यांनी हा विषय न्यायालयात नेला होता. त्यावेळी लढ्यात सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले होते. मात्र, तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचं मुंबई मी केलं म्हणून सांगता आणि यावरून भाजपाचे लोक मुर्खासारखे टाळ्या वाजवतात, हे सगळंच हास्यास्पद आहे.
हेही वाचा – पावसाचं सावट! पुढील ३ दिवस ‘या’ जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालणार
१०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबईत निर्माण झाली आहे. हे हुतात्मे मराठीत होते. यापुढे जेव्हा मुंबईवर हल्ला होईल, तेव्हा असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता या महाराष्ट्रात आणि असली शिवसेनेत आहेत, हे अमित शाह यांनी लक्षात ठेवावं, असंही संजय राऊत म्हणाले.
अमित शाह काय म्हणाले?
मुंबईसाठी ज्या लोकांनी आंदोलन केलं, मुंबई हेच नाव हवं, अशी मागणी ज्या लोकांनी केली होती, त्यामध्ये मी देखील होतो. तेव्हा बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं, अशी मागणी मी देखील केली होती, असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.





