निवडणूक आयोगाप्रमाणे न्यायालयाचा निकाल विकत घेण्याची शिंदे गटाची तयारी
भाजपवाले उद्या यांना पाच जागाही देतील
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर संपली आहे. आता न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. हा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे. मात्र, निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे सांगता येत नाही. याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर विधान केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चिंता एकनाथ शिंदे यांना सतावत आहे. मुख्यमंत्र्यांना चिंता वाटते की, निवडणूक आयोगाप्रमाणे हा निकाल विकत घेऊ का? यासाठी तयारी सुरू आहे. या सरकारवर निसर्गही कोपलाय, शेतकरी हवालदिल असून आक्रोश करतोय, सरकार मात्र तोडबाजीमध्ये रमल आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागणार? याची मुख्यमंत्र्यांना चिंता वाटतेय. त्यामुळे निवडणूक आयोगाप्रमाणे आम्ही हा निकालसुद्धा विकत घेऊ का? याची त्यांची संपूर्ण तयारी सुरू आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या १७० जागा निवडून येतील. पण आपण २४० जागांवर लढणार आहोत. शिंदे गटाचे ५० च्यावर आमदार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.
उद्या भाजपावाले त्यांना पाच जागा देतील. हीच शिंदे गटाची लायकी आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने एका जागेसाठी युती तोडली होती. स्वाभिमानासाठी युती तोडली होती. यांना मात्र तुकडे फेकले आहेत. आयुष्यभर त्यांना तुकडा तोंडात चघळत बसावे लागेल. यांना कुठला आलाय स्वाभिमान? उद्या यांना भाजपवाले पाच जागाही देतील. ही लायकी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.