‘वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्यासमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरली’; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला मात्र अद्याप ते वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? हा आमचा प्रश्न आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे लिंबू सापडले असं विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. किती वेळा त्यावर बोलायचं? देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? हा ‘मारूती कांबळेचं काय झालं’, यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके दिवस झाले त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन. पण मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षावर अद्याप आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाहीत? असा सवाल संजय राऊतांनी केला.
हेही वाचा : सरकारी कार्यालयांमध्ये आता मराठी भाषा अनिवार्य; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
मी असं ऐकलंय की फडणवीस म्हणाले राहायला गेलो तरी मी वर्षावर झोपायला जाणार नाही. हा काय प्रकार आहे? आख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागली आहे. शिंदे गटातल्या या लिंबू सम्राटांनी त्याचं उत्तर द्यावं. भाजपाच्या अंत:स्थ गोटात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्य देवी मंदिरात कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगं पुरली आहेत जेणेकरून दुसऱ्या कुणाकडे मुख्यमंत्रीपद टिकू नये. अशी चर्चा आहे. त्यांचेच लोक सांगत आहेत. तिथला कर्मचारीवर्ग सांगतोय. हे खरं आहे की खोटं आहे माहिती नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. त्यांच्या प्रतिष्ठेचा तो मुद्दा आहे. नक्की तिथे काय घडलंय? कुणामुळे झालंय? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? ते का अस्वस्थ आहे? हे महाराष्ट्राला समजायला हवं, असंही संजय राऊत म्हणाले.