‘चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीने अटक करा’; संजय राऊतांचं विधान

मुंबई | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. “सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्स सर्व्हिलन्सवर टाकले आहेत,” असं वक्तव्य बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात केलं. या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत बावनकुळे यांच्यावर ‘इंडियन टेलिग्राफ ॲक्ट’नुसार गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर इंडियन टेलिग्राफ ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करा आणि त्यांची चौकशी करा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅसिसचं मशीन स्वत: आणलेलं आहे का? की भाजपाच्या कार्यालयात लावलेलं आहे? किंवा त्यासाठी काही खासगी लोक कामाला लावले आहेत का? असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हा विषय फक्त भाजपाच्या संदर्भात नसून महाराष्ट्रातील सर्व विरोधी प्रमुख नेत्यांचे देखील फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत. त्यांचे व्हॉट्सअॅप पाहिले जात आहेत. हे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि मुंबईतील काही बिल्डर्स आणि नागपूरमधील काही यंत्रणा यांनी एकत्र येऊन एक वॉर रुम सुरु केलं आहे. त्या माध्यमातून शिंदे गटाच्या नेत्यांचेही फोन सर्व्हिलन्सवर आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
चंद्रशेखर बानकुळे नेमकं काय म्हणाले?
कार्यकर्त्यांचे मोबाईल व भंडाऱ्यातील व्हॉट्सअॅप ग्रुप्स सर्वेलन्सवर टाकले आहेत. तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील. तुमचं एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. तुमच्या एका चुकीमुळे भंडारा शहराचं नुकसान होईल. तुमचं एक चुकीचं पाऊल भंडारा शहर उद्ध्वस्त करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही तर रागाच्या भरात काही लोक तमाशा उभा करतात, चुकीचं मत व्यक्त करतात. तुमचं एक चुकीचं मत व तुमच्या बंडखोरीचा पक्षाला मोठा फटका बसेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.




