स्वातंत्र्यानंतर मतदानाचा विक्रम…! पं. बंगाल, तामिळनाडूच्या मतदान टक्केवारीची देशभर चर्चा…

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वातंत्र्यानंतरचं सर्वाधिक मतदान नोंदवलं गेलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही माहिती दिली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल ९२ पूर्णांक ८८ शतांश टक्के मतदान झालं. कुचबिहार आणि दक्षिण दिनाजपूरमध्ये सर्वाधिक ९५ टक्के मतदान झाले. तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३४ जागांसाठी काल एकाच टप्प्यात मतदान झालं. आजवरच्या विक्रमाची नोंद करत तमिळनाडूमधे ८५ पूर्णांक १५ शतांश टक्के मतदान झाले.
तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीप्रमाणेच पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्येही विक्रमी मतदान झाले आहे. गुरुवारी बंगाल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २९४ पैकी १५२ जागांवर ९२% मतदान झाले. तमिळनाडूत २३४ जागांवर विक्रमी ८५% मतदान झाले. राज्याच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे.
हेही वाचा – गरीब रुग्णांना आता तातडीने मदत! मुख्यमंत्री सहायता निधीतून २० गंभीर आजारांवर उपचार
हे आकडे इतके जास्त आहेत की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वतः म्हटले आहे की, स्वातंत्र्यानंतर मतदानाची टक्केवारी इतकी कधीच नव्हती. या दिवसाला ‘लोकशाहीचा सुपर थर्सडे’ म्हटले जात आहे.
दरम्यान, तामिळनाडूत झालेल्या एकूण मतदानापैकी पुरुषांची मतदानाची टक्केवारी ८३.५७ टक्के तर महिलांची टक्केवारी ८५.७६ टक्के इतकी आहे. तर दुसरीकडं पश्चिम बंगालमध्ये ९०.९२ टक्के पुरुषांचं मतदान तर ९२.६९ टक्के महिलांचं मतदान झालं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही राज्यांमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





