वडील सापडतात, मग मुलगा का नाही? वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | मुंबईतील वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडण्याच्या प्रकरणात मिहीर शाह हे नाव समोर आलं आहे. आरोपी मिहीर शाह हा एकानाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. राजेश शाह यांना अटक करण्यात आली आहे. तर मिहीर शाह सध्या फरार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यावरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, वरळीच्या आसपास रात्री अडीच वाजता हा अपघात झाला आहे. शिवसेनेचे राजेश शाह आणि त्यांच्या मुलाकडून हा अपघात झाला. यामध्ये एका कोळी बांधवाच्या पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना गंभीर आहे. या अपघातातील मुलगा अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही. याचा अर्थ असा आहे की राजेश शाह हे त्यांच्या मुलाला पाठीशी घालत आहेत. वडील सापडतात आणि मुलगा पोलीस ठाण्यात नेले असते आणि मेडीकल केले असते तर तो यामध्ये अडकेल यामुळे त्याला पाठीशी घातलं जात आहे. पण पोलिसांनी या अपघात प्रकरणातील आरोपीला अटक केली पाहिले.
हेही वाचा – एग्रीमेंटचे नूतनीकरण केले नाही, तरी घरमालक भाडे वाढवू शकतो का? नियम काय आहे?
अपघातातील आरोपी रात्री अडीच वाजता एका पबमधून बाहेर आला. हा पब रात्री अडीच वाजता सुरु होता. याचा अर्थ महाराष्ट्रात अद्यापही नियमाच्या बाहेर पब चालू आहेत. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बोर्ड लागले होते की, बुलडोझर बाबा. मात्र, ते चित्र हे खोटं आहे. वरळीत रात्री दोन वाजता पबमधून या अपघाताच्या घटनेतील मुलगा बाहेर पडतो. याचा अर्थ पब रात्री चालू आहेत. मग राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधिकारी काय करतात? या महाराष्ट्रात काय चाललंय? असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
या अपघातामधील कारवरील लोगो आणि नंबर प्लेट ज्या प्रकारे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे त्यांनाही अटक झाली पाहिजे. आता मी वरळी पोलीस ठाण्यात जाणार असून या घटनेतील तो मुलगा का सापडत नाही? यासंदर्भात प्रश्न विचारणार आहे. राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. या प्रकरणात तातडीने कारवाई झाली पाहिजे. या घटनेत जर त्या मुलाला अटक केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आमची बाजू मांडणार आहोत, असंही रवींद्र धंगेकर म्हणाले.





