राज्यसभा बिनविरोध! राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7 उमेदवारी अर्ज!

मुंबई | महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अखेर बिनविरोध पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून चार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक आणि शिवसेनेकडून एक असे एकूण सहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे एकूण सात जागांसाठी सातच उमेदवार मैदानात असल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
या निवडणुकीत सुरुवातीला चुरस होण्याची शक्यता वर्तवली जात होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे अतिरिक्त 20 मते असल्याने ते दुसरा उमेदवार देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यासाठी रोहित टिळक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू होती. मात्र शेवटच्या क्षणी शिवसेनेने दुसरा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
हेही वाचा : बँक घोटाळा करणाऱ्यांना कारागृहात जावे लागले, असे का म्हणाले गडकरी?
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी खबरदारी म्हणून काही उमेदवारांनी दोन-दोन अर्ज दाखल केले आहेत. शरद पवार यांनी दोन अर्ज भरले असून राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनीही प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. एखादा अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाला तरी दुसरा अर्ज कायम राहावा, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
दरम्यान, तब्येतीच्या कारणामुळे शरद पवार अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ज दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. आजारी असल्यामुळे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उपस्थित राहू शकला नाही आणि अधिकाऱ्यांनी घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण केली, अशी ही पहिल्यांदाच घडलेली घटना ठरली आहे.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून निवड निश्चित झालेले उमेदवार
भाजपचे उमेदवार :
रामदास आठवले
विनोद तावडे
माया चिंतामण ईवनाते
रामराव वडकुते
शिवसेना शिंदे गट :
ज्योती वाघमारे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट :
पार्थ पवार
महाविकास आघाडी :
शरद पवार





