तळवडे-निगडी वाहतूक कोंडीतून सुटका होणार?
आमदार महेश लांडगे यांच्या कॅनबे चौक ते भक्ती शक्ती रस्त्याच्या प्रस्तवाला गती द्यावी - नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांचा पाठपुरावा

४५ मीटर रुंद रस्त्यासाठी हालचालींना वेग!
पिंपरी-चिंचवड | तळवडे ते निगडी (पुणे-मुंबई महामार्ग) दरम्यान होणारी भीषण वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. तळवडे येथील कॅनबे चौकापासून संरक्षण विभागाच्या (Defence) हद्दीतून थेट भक्ती-शक्ती (पुणे गेट हॉटेल) पर्यंत ४५ मीटर रुंद रस्ता विकसित करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. या संदर्भात शहर सुधारणा समितीचे सदस्य प्रा. उत्तमराव केंदळे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा करून तातडीने बैठक लावण्याची मागणी केली आहे.
देहू-आळंदी रस्ता आणि तळवडे परिसर हा चाकण MIDC ला जोडणारा मुख्य दुवा आहे. सध्या चाकणकडून येणारी सर्व वाहतूक तळवडे, त्रिवेणीनगर आणि निगडी चौक या मार्गावरून येते. अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे या भागात तासनतास वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका आयटी कर्मचारी, उद्योजक आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे.
हेही वाचा
हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नका; आमदार शंकर जगताप
या रस्त्यासाठी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी ३० जून २०२३ रोजी पत्र देऊन संरक्षण विभागाकडून जागा घेण्याची मागणी केली होती. आता या मागणीला प्रशासकीय स्तरावर गती मिळावी, यासाठी प्रा. उत्तमराव केंदळे यांनी आयुक्तांकडे संबंधित विभागांची विशेष बैठक लावण्याची आग्रही विनंती केली आहे. आता महानगरपालिका प्रशासन यावर कधी बैठक घेते आणि संरक्षण विभागाकडून जागा मिळवण्याबाबत काय पावले उचलते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
नियोजित मार्गाचे फायदे:
स्वतंत्र मार्ग: संरक्षण विभागाच्या हद्दीतून हा रस्ता झाल्यास चाकण MIDC मधून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यासाठी एक स्वतंत्र आणि वेगवान मार्ग उपलब्ध होईल. कोंडीतून मुक्ती: तळवडे आणि चिखली परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. वेळेची बचत: निगडी आणि देहूरोड भागात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि जलद होईल.
तळवडे आणि निगडी परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न गंभीर आहे. आमदार महेश लांडगे यांच्या प्रस्तावाला गती देऊन ४५ मीटर रुंद रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीबाबत (तळवडे गट नं. ४१४, ४२१ ते निगडी गट नं. ३५ पर्यंत) योग्य कार्यवाही झाल्यास संपूर्ण शहराला याचा फायदा होईल. प्रशासनाने यात तत्काळ लक्ष घालून बैठक घ्यावी ही आमची मागणी आहे.
– प्रा. उत्तम केंदळे (सदस्य, शहर सुधारणा समिती)





