लक्ष्मी ऑरगॅनिकसारख्या प्रकल्पांना कोकणात विरोधच; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

चिपळूण : कोकणातील पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता, लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प चिपळूणसह कोकणात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने चिपळूण येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
विकास आवश्यक असला तरी तो पर्यावरणपूरक आणि स्थानिकांच्या हिताचा असलाच पाहिजे असे शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रदूषण वाढवून कोकणातील नागरिकांच्या आरोग्यावर तसेच शेती व मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम करणारे प्रकल्प सरकार सहन करणार नाही असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – राज्यात औद्योगिक विकासासाठी भक्कम पायाभरणी!
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली असली, तरी पुढे या प्रकल्पावर नेमकी काय कारवाई पुढे या प्रकल्पावर नेमकी काय कारवाई होणार, परवानग्या रद्द होणार का, किंवा शासन स्तरावर कोणते आदेश निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेमुळे महायुती सरकार कोकणातील पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. मात्र या विधानानंतर प्रत्यक्ष निर्णय आणि कारवाई लवकरात लवकर झाली, तरच नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.या वेळी उद्योगमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपनेते प्रशांत यादव व पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणच्या मुळावर उठणारे निसर्गरम्य कोकणाची दशा करणारे प्रकल्प म्हणजे विकास नसून अधोगतीला आमंत्रण देण्यासारखं आहे. गेले कित्येक दिवस कोकणवासियांचा या प्रकल्पाला विरोध ठाम होता. आता जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे चिपळूणमधील नागरिकांसाठी ही बाब दिलासादायक आहेे.




