‘ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय आत्मनिर्भरता अशक्य’; केंद्रिय मंत्री नितीन गडकरी

Nitin Gadkari | शहराबरोबरच ग्रामीण भागाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत देश आत्मनिर्भर होउ शकत नाही. यासाठी ग्रामीण भागासाठी चांगले रस्ते, पाणी आणि वीज या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असं केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. इस्लामपूर येथे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेच्या नवीन विद्यार्थी वसतीगृह इमारतीचे आणि जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन केंद्रिय मंत्री गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की महात्मा गांधी ९० टक्के लोक खेड्यात राहतात असे सांगत होते. मात्र, आज यापैकी ३५ टक्के लोक शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. हे स्थलांतर आनंदाने झालेले नाही, तर सुविधांच्या अभावाने झाले आहे. यातून शहरी भागात झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. जीडीपीमध्ये २२ ते २४ टक्के वाटा उद्योगाचा, ५२ ते ५४ टक्के सेवाक्षेत्राचा आहे, तर केवळ १४ टक्के वाटा ग्रामीण व शेतीचा आहे. जर ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर चांगले रस्ते, वीज, पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हे झाले तरच भारत आत्मनिर्भर होउ शकतो.
हेही वाचा : मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त व्हावा!
राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच हवे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले होते, निवडून आला नाही तर तुम्ही पक्षाचे, आमदार, खासदार झाला तर जनतेचे आणि मंत्री झाला तर देशाचे हा विचार हवा. राजकारण हे विकासाचे हवे, केवळ सत्तेचे राजकारण देशाचा विकास करू शकत नाही. राजकारणात होणारी टीका ही मनावर फारशी घ्यायची नसते. केवळ बातम्यामधून उपस्थित केल्या जाणार्या शंकांमुळे संवेदनशील राहू नये, असं नितीन गडकरी म्हणाले.