..तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता; नितीन गडकरी यांचं विधान

Nitin Gadkari | छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी माफी मागितली. आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुतळा उभारणी करताना स्टेनलेस स्टिलचा वापर करायला हवा होता, असं विधान केले आहे.
नितीन गडकरी म्हणाले, मागच्या तीन वर्षांपासून समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या रस्ते आणि त्यावरील पुलासाठी स्टेनलेस स्टिलचा वापर करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. मी मुंबईत असताना ५५ उड्डाण पूल बांधले होते. त्यावेळी एका व्यक्तीने मला उड्डाण पुलांची पाहणी करण्यासाठी बोलावले. पुलाचे बांधकामात वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्यांवर तो पावडर कोटिंग करून वापरत असल्याचे दिसले. यावर प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, यामुळे सळ्या गंजरोधक होतात. पण तरीही सळ्यांना गंज पकडल्याचे मला दिसले. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून तीन किमीच्या अंतरावर असलेल्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर झाला पाहिजे, असे मत मी मांडत आलो. जर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर तो पुतळा पडला नसता, असं गडकरी म्हणाले.
हेही वाचा – शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
नितीन गडकरींच्या या विधानाला शरद पवार यांनी दुजोरा दिला. नितीन गडकरी केंद्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांनी एखादे काम हाती घेतले, तर ते मन लावून ते काम करतात. त्या कामाचा बारकाईने अभ्यास करतात. कामाचा दर्जा चांगला राहिल याची काळजी घेतात. देशामधील अनेक रस्ते त्यांनी चांगल्या पद्धतीने बांधले आहेत. आम्ही हे संसदेतही मोकळेपणाने सांगितले आहे. नितीन गडकरी यांनी पुतळ्याच्या कामाबाबत काही मत व्यक्त केले असेल तर त्याचा नक्कीच अभ्यास त्यांनी केला असेल, असं शरद पवार म्हणाले.





