‘काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले’; नितीन गडकरींची टीका

Nitin Gadkari | स्वातंत्र्यानंतर ग्रामपंचयातीपासून संसदेपर्यंत सर्वाधिक काळ काँग्रेसची सत्ता होती. मात्र देशाची गरीबी हटली नाही आणि विकासही झाला नाही. काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्यांची गरीबी जरूर हटली. काँग्रेसने देशात फक्त जातीयवादाचे आणि सांप्रदायिकतेचे विष कालविण्याचे काम केले, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते उमरखेड येथे भाजप महायुतीचे उमेदवार किसन वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, की काँग्रेस देशात जाणीवपूर्वक भाजप संविधान बदलविणार असा संभ्रम निर्माण करत आहेत. पण घटनेची मुलभूत तत्व बदलता येत नाहीत, हे सत्य आहे. कोणतेही सरकार आले तरी संविधान बदलू शकत नाही. मात्र, आणीबाणीमध्ये काँग्रेसनेच संविधानाची मोडतोड केली. आम्ही संविधान बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही.
हेही वाचा – मोठी बातमी! मुंबईतल्या विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये सापडल्या साडेसहा टन चांदीच्या विटा
काँग्रेस दर निवडणुकीला लोकांच्या मनात विष कालवते. अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही, ही काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची रोजगार हमी आहे, अशी टीका गडकरी यांनी यावेळी बोलताना केली. पंतप्रधान ग्रामसडक योजना ही भाजपने सुरू केली. देशातील जवळपास साडेतीन लाख गावांना सर्वप्रथम पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी पक्क्या रस्त्यांनी जोडले. काँग्रेसने चुकीच्या क्षेत्रात सरकारी गुंतवणूक केली आणि गावांकडे दुर्लक्ष केले. गावातील शेतकरी, मजूर, कामगार, सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केला नाही, असंही नितीन गडकरी म्हणाले.





