‘पुरुष रात्री दोन वाजेपर्यंत पार्ट्या रंगवतील, पण महिला इमानदार मतदार’; नवनीत राणांचे वादग्रस्त वक्तव्य

Navneet Rana | अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचे पुरुष मतदारांविषयी केलेले विधान चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महिला मतदारांना इमानदार ठरवतांना त्यांनी पुरुषांविरोधात तोंडसुख घेतले. पुरुष मंडळी खूप ठिकाणी जातात. आता अनेक पार्ट्या, कार्यक्रम होईल, सर्व पुरुष मंडळी रात्री दोन ते तीन वाजता घरी येतील, असं वादग्रस्त विधान नवनीत राणा यांनी केले. या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुडण्याची चिन्हे आहेत.
नवनीत राणा म्हणाल्या, महिला बाहेर निघत नाहीत. बाहेर निघाल्या तर राणी लक्ष्मीबाई, मॉ जिजाऊ झाल्याशिवाय राहत नाही. महिलांनी नक्की केले की ते होतेच. महिला खूप विचार करून बोलतात. कारण त्या कधी कुणाचे पैसे घेणार नाहीत. कोणात्या पार्ट्यांमध्ये जाणार नाहीत, असे मतदार म्हणजे महिला आहेत. पुरुष मंडळी खूप ठिकाणी जातात. आता नगर पालिका निवडणुकीत अनेक पार्ट्या, कार्यक्रम होतील. सर्व पुरुष मंडळी रात्री दोन ते तीन वाजता घरी येतील. पण आमची महिला सर्वात जास्त इमानदार असते. महिला चटणी भाकर खातील, पण शेवटच्या श्वासापर्यंत घराला घर बनवणार. तो मतदार म्हणजे महिला वर्ग आहे.
हेही वाचा : “तुम्ही मला दोन तारखेपर्यंत सांभाळा मी तुम्हाला पुढील पाच वर्ष..”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विकास योग्य पद्धतीने सुरू आहे. विरोधकांकडून मतचोरीचा आरोप होतो. मतचोरी झाली असती तर आम्ही पराभूत कसे झालो असतो? असा सवाल नवनीत राणा यांनी केला. मतदान करतांना नातेवाईक, शेजारी, जाती, धर्म पाळू नका. मतविभाजन होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. शहराचा विकास करायचा असेल तर निधी कोण देणार आहेत? याचा विचार करा. देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. स्थानिक आमदार सुद्धा भाजपचे आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप राहिली तरच निधी मिळेल व विकास होईल. एकही रस्ता, सभागृह, मंदिर, समाज मंदिर, रुग्णालय आदींचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे देखील नवनीत राणा म्हणाल्या.




