‘प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करून अटक करा’; नारायण राणे यांचं मोठं विधान
मुंबई : महाराष्ट्रात कधीही दंगली घडू शकतात, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यावरून प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. त्यांनी तारीखही दिली आहे की तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत असं काही होऊ शकतं. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? पोलिसांना अलर्ट दिलाय का? असा प्रश्न पुण्यात पत्रकारांनी नारायण राणे यांना विचारला.
हेही वाचा – World AIDS Day 2023 : १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या सविस्तर
त्यावर नारायण राणे म्हणाले, त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. दंगलीचा आधार सांगा. आंबेडकर असो किंवा इतर कोणीही, दंगलीविषयी बोलत असेल तर, पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगली रोखण्यासाठी कारवाई करायला हवी, असं नारायण राणे म्हणाले.