‘हे खा’, ‘ते खा’ किंवा ‘ते खाऊ नका’ हे सांगणे म्हणजे धर्म नव्हे; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

Mohan Bhagwat | ‘साप्ताहिक विवेक’ आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने डॉ. मिलिंद पराडकर लिखित ‘तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी ‘हे खा’, ‘ते खा’ किंवा ‘ते खाऊ नका’ हे सांगणे म्हणजे धर्म नव्हे, असं मत व्यक्त केले.
डॉ. मोहन भागवत म्हणाले, धर्म म्हणजे पूजा नाही. सत्य, करुणा, शुचिता आणि तपस्या यातून धर्माची मूल्ये पुढे आली आहेत. त्यामुळे ‘हे खा’, ‘ते खा’ किंवा ‘ते खाऊ नका’, ‘शिवू नका’, हे सांगणे म्हणजे धर्म नाही. हिंदू धर्म हे नाव नाही, तर एका विचाराने जगणारे आणि सर्वांना स्वीकारणारे ते एक उदात्त विशेषण आहे.
हेही वाचा – केरळी वाद्य ‘चेंदा मेलम’ वादनाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिवादन
जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे, तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राची निर्मिती झाली आहे. सत्ययुगापासून स्वातंत्र्य लढ्यापर्यंत धर्म हीच आपली शाश्वत प्रेरणा राहिली आहे. यालाच हिंदू प्रेरणा असे म्हटले जाते. हिंदू म्हणजे मुस्लिम विरोध नाही, तर सर्व समाजाचे रूप दर्शविणारे विशेषण आहे. सर्व विविधतांना स्वीकारणारे तो उदात्त भाव आहे, असं मोहन भागवत म्हणाले.
धर्मप्राय देशाचा धागा एकतेचा आहे. सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे. हिंदू हा गौरव आहे. मात्र, पत्ता लागू न देता, हजारो वाटांनी त्यावर अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा विविध बाबींचे असून, ते देशासाठी घातक आहे. भारत देश मोठा झाला, तर राजकीय दुकान बंद होईल, ही भीती या अतिक्रमणामागे आहे. अस्तित्व टिकविण्यासाठी राष्ट्र किंवा राज्य निर्माण झालेले नाही. ते चोहोबाजूंनी सुरक्षित असून, समृद्ध आहे. इस्लामी आक्रमणाचे स्वरूप लक्षात न आल्याने अनेक देदिप्यमान संघर्ष विफल झाले. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा उपाय लागू पडला. त्याचीच प्रेरणा घेऊन राजस्थानमध्ये भारत दुर्गादास राठोड, छत्रसाल अशा अनेकांनी संघर्ष केला. अगदी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यातही शिवाजी महाराज हीच प्रेरणा होती, असं मोहन भागवत म्हणाले.





