ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

‘बटेंगे-कटेंगेचा तडका, अंग अंग भडका’ नारा देऊन महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम भडका उडविण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले होते. यावेळी त्यांनी ‘बेटेंगे तो कटेंगे’ असं जाहीर सभेत विधान केलं. त्यांच्या विधानावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. तर महाविकास आघाडीने मात्र यावर तीव्र आक्षेप घेतला. आजच्या सामनाच्या अग्रलेखातही यावर भाष्य करण्यात आलं आहे. ‘बटेंगे-कटेंगेचा तडका; अंग अंग भडका!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा
‘बटेंगे-कटेंगेचा तडका, अंग अंग भडका’ अशी महायुतीतील आणि भाजपमधील काही मंडळींची अवस्था झाली आहे. तीच अस्वस्थता या घोषणांना होणाऱ्या त्यांच्या जाहीर विरोधातून दिसून येत आहे. भाजपने हा तडका देऊन महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम भडका उडविण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यावरून महायुती आणि खुद्द भाजपमध्येच भडका उडाला आहे. भाजपवाल्यांनी खुशाल त्यांच्या घोषणांच्या नंदनवना त राहावे, पण तुमचा हा तडका आणि भडका महाराष्ट्रात चालू देणार नाही, असाच निर्धार येथील जनतेने केला आहे. मि. फडणवीस, राज्यातील जनतेचा ‘मिजाज’ हाच आहे!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. आतापर्यंतच्या प्रचारात भाजपसह सत्ताधारी महायुतीला महाराष्ट्रातील जनता ‘एक दिलाने’ घरी बसवणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचाराचा फोकस नेहमीप्रमाणे जातीय-धार्मिक मुद्द्यांवर नेण्यास भाजपवाल्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या आवडत्या हिंदू-मुस्लिम मुद्द्याला ही मंडळी उठता-बसता ‘फोडणी’ घालत आहे. त्यावर ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ वगैरे विषारी घोषणांचा तडका देत वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा तवा तापवून त्यावर मतांची पोळी भाजून घ्यायची, हाच भाजपचा या घोषणांमागील सुप्त हेतू आहे. त्यासाठीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटेंगे तो कटेंगे’ ही आणि पंतप्रधान मोदी वाजवीत असलेली ‘एक हैं तो सेफ है’ ही पिपाणी सर्वत्र वाजवली जात आहे. सोशल मीडियावरही भाजप आणि परिवारातील सायबर धाडी या घोषणांना पूरक पोस्ट्स व्हायरल करून भाजपचा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवीत आहेत. हे सगळे जोरात सुरू असले तरी ‘बटेंगे तो कटेंगे’च्या फोडणीचा ठसका भाजपच्या मित्रपक्षांनाच नाही, तर स्वपक्षातील काही मंडळींनाही लागला आहे. अजित पवार यांनी तर या घोषणेला थेटच विरोध दाखवला आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button