जितेंद्र आव्हाडांचा सैफ अली खान प्रकरणात अजून एक खळबळजनक दावा
प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सैफ अली खान प्रकरणात अजून एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक जळजळीत पोस्ट केली आहे. काल त्यांनी या सर्व प्रकरणात धार्मिक कट्टरतेचा वास येत असल्याचा दावा केला होता. धार्मिक कट्टरतेतूनच सैफ अलीवर हल्ला झाल्याचा दावा आव्हाडांनी केला होता. तर आज त्यांनी त्याहून मोठा आरोप केला. हल्लेखोराच्या हिटलिस्टवर सैफ नाही तर ही व्यक्ती असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांच्या या दाव्याने या संपूर्ण प्रकरणाचा अँगलच बदलून टाकला आहे. घटनेला दोन दिवस उलटले तरी आरोपी अटकेत नाहीत. संशयीतांची धरपकड तितकी सुरू आहे. आता आव्हाडांनी याप्रकरणाला चोरीचा नाही तर इतर पदर असल्याचा दावा केला आहे.
तैमूरचा अर्थ सांगितला समजावून
तैमुर समाज माध्यमांमध्ये जग भरात प्रचंड लोकप्रिय झाला. नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून ,प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नावदेखील पौराणिकच आहे. त्याचा अरेबिक अर्थ आहे, ‘लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!’ त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव “तैमूर” असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे, असा प्रहार आव्हाडांनी केला.
प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर…
सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही. तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की, सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे, असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान आव्हाड यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे काल सत्ताधारी गोटातील नेत्यांनी आवाहन केले. तर आव्हाड सैफवरील हल्ल्यामागे दुसरा पदर असल्याचे आणि त्यामागे धार्मिक कारण असू शकते, असा दावा दोन दिवसांपासून करत आहेत. जोपर्यंत प्रकरणातील हल्लेखोर पकडल्या जात नाही, तोपर्यंत सत्य समोर येणार नाही. हल्लेखोराला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.





