“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही”; खासदार संजय राऊतांनी दिलं जाहीर आव्हान
!["I will not allow BJP to be the Chief Minister of Maharashtra"; MP Sanjay Raut gave a public challenge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Sanjay-Raut-Devendra-Fadanvis3-3.jpg)
मुंबई |
महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. टीव्ही ९ शी बोलताना संजय राऊत यांनी त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात असाही टोला लगावला. महाविकास आघाडी हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे असंही ते म्हणाले आहेत. “जे वैफल्यग्रस्त असतात, निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. त्यांचा जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले.
- “भाजपासोबत युतीची चर्चा नाही”
“युतीची कसलीही चर्चा नाही. कुणाशीही चर्चा नाही. दबके आवाज वैगैरे असं काही नसतं. आमच्याकडून कोणी परस्पर काही बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तो मूर्खपणा आहे. शिवसेना-भाजपा युतीत आम्ही थोडंफार आम्ही २५ वर्ष एकत्र होतो, नांदलो ते नातं भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे. वैफल्यग्रस्त, निराश मनाने राजकारण करणारे असतात, त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशा असते,” असं राऊत म्हणाले.
- “स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडी एकत्र”
“स्थानिक पातळीवर स्थानिक राजकारण्याच्या नावाखाली काही भ्रष्ट हातमिळवणी होत असतात. आमची भाजपासोबत युती असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. आता अशी मनमानी चालणार नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. आम्ही दक्षता घेत असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनेही घ्यावी. जास्तीत जास्त आपले नगराध्यक्ष निवडून यावेत यासाठी सर्वांनी काम करावं,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.
- “झुकेंगे नही हाच सेनेचा बाणा”
‘झुकेंगे नही’ हा पुष्पातील डायलॉग हा शिवसेनेच्या बाण्यावरून घेतला असावा. ‘झुकेंगे नही’ हा आमचा गेल्या ५५ वर्षापासूनचा नारा आहे. संजय राऊतांचा तर तो नाराच आहे. कशाला झुकायचं? का झुकायचं? संघर्ष करतो, लढतो. आमचे काही उमेदवार बाद झाले असले तरी आम्ही लढू,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.