“मी अन् एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले”; मनोज जरांगेंच्या उपोषणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

Devendra Fadnavis : ५८ लाख जणांच्या कुणबी नोंदीना प्रमाणपत्र आणि वैधता द्यावी, मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. परिसरातील काही मंडळींनीही त्यांना पाठिंबा दिला असून मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटीलही त्यांची समजूत काढण्याकरता आंदोलन स्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतला आहे. प्रत्येकवेळी अडचणीच्या काळात निर्णय घेतला आहे. सरकारची भूमिका पारदर्शक आहे. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. ही सकारात्मक भूमिका सरकार सातत्याने मांडतय. यापुढेही सरकारची भूमिका सकारात्मकच असेल. आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे. आम्ही समाजाला पुढे आणून भांडण करत नाही. सर्वांचं कसं भलं हईल, याचा विचार करतो.”
हेही वाचा – एक कुटुंब एक कनेक्शन, 1 जूनपासून एलपीजीचा नियम बदलणार, पीएनजीला प्रोत्साहन, नेमकं काय बदलणार?
पुढे ते म्हणाले, “मराठा समाजाकारता मी आणि एकनाथ शिंदें यांनी जेवढे निर्णय घेतले तेवढे इतिहासात कधी झाले नाहीत. आम्ही मराठा समाजाच्या हिताकरता निर्णय घेत राहू. हे निर्णय घेत असताना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावं लागेल. याचा अवलंब न करता निर्णय घेतला तर ते निर्णय टिकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर खरे ठरणारे सर्व निर्णय आम्ही घेऊ”, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेताना ओबीसी समाजाचा विचार करण्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी स्पष्टपणे सांगतो की एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं, असं आम्ही कधी करणार नाही. आम्ही मराठा समाजाचं समाधान करू. त्यावेळी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कोणताही निर्णय घ्यायला तयार आहेत.”





