“सगळेच कष्ट आणि मेहनत करत असतात. मात्र,…”; भुजबळांचा रोख कोणाकडे? पुन्हा सूचक वक्तव्य

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चांना फेटाळून लावत त्यांनी नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर आता छगन भुजबळ यांनी सूचक वक्तव्य केले असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या 26 वर्षांमध्ये राजकारणात काहीजण मेहनतीने पुढे आले आहेत. सगळेच कष्ट आणि मेहनत करत असतात. मात्र, काहीजण कष्ट न करता देखील पुढे जातात, असे सूचक वक्तव्य भुजबळांनी केले आहे. त्यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.
भुजबळांच्या या वक्तव्याचा नेमका रोख कोणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिक बळकट होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
राज्यसभेवर जाण्याची इच्छा असलेल्या छगन भुजबळ यांनी यापूर्वी आपले पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, याबाबत तातडीने निर्णय न झाल्याने त्यांना राज्यसभेची संधी मिळाली नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली.
हेही वाचा – ‘ही सर्वात मोठी परीक्षा…’ ; नेहरूंचा विक्रम मोडीत काढल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
या घडामोडीनंतर भुजबळ यांनी पक्षातील इतर नेत्यांच्या कुटुंबियांना जसा न्याय मिळतो, तसाच न्याय आपल्यालाही मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केल्याचे मानले जात आहे.
“नमस्कार हा ताकदीला आणि चमत्कारालाच होतो. एखाद्या नेत्यामागे किती आमदार, खासदार किंवा नगरसेवक आहेत, यावरच अनेक गोष्टी अवलंबून असतात,” असे वक्तव्य करत भुजबळांनी राजकीय वास्तवावर भाष्य केले.
ते पुढे असेही म्हणाले की, “अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा ताई पुढे आल्या आहेत. अनेकांना वाटते की पक्षाने त्यांना अपेक्षित संधी दिली नाही. मात्र, प्रत्येकाने पक्षासाठी काम करत राहिले पाहिजे. पदे मर्यादित असतात, पण पक्ष सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एकजुटीने काम करण्याची गरज आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम गुरुवारी 11 जून रोजी पार पडणार असून, या कार्यक्रमात छगन भुजबळ कोणती भूमिका मांडतात आणि त्यांच्या भाषणातून कोणते संकेत मिळतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





