“तिजोरीत खूप पैसे नसले तरी…”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या टीकेवरही दिले सडेतोड उत्तर

Maharashtra Winter session 2025 : राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी विदर्भाच्या मुद्द्यावरुन गदारोळ करण्याचा प्रयत्न केला त्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी संताप व्यक्त केला. याशिवाय फडणवीस यांनी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे सर्व आरोप फेटाळत लावत राज्याची अर्थव्यवस्था सुदृढ असल्याचा दावा केला.
“महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य आहे. 2029 ते 2030 दरम्यान महाराष्ट्र हा देशातील पहिली एक ट्रिलिनय डॉलर्सची अर्थव्यवस्था असेल, याबद्दल मला विश्वास आहे. आपल्या तिजोरीत खूप पैसे नसले तरी महाराष्ट्र हा सशक्त अर्थव्यवस्थेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे, ” असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेटं तयार केले आहे. त्यामध्ये 2047 चा विकसित महाराष्ट्र कसा असेल याचा रोडमॅप आपण तयार केला आहे. याचे 2030 चा पहिला टप्पा, 2035 चा दुसरा टप्पा आणि 2047 चा तिसरा टप्पा आहे. 2029 ते 2030 दरम्यान महाराष्ट्र हा देशातील पहिली एक ट्रिलिनय डॉलर्सची अर्थव्यवस्था असेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – ‘…तो मैं खुद की भी नहीं सुनता’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात तुफान फटकेबाजी
तर निवडणुका झाल्यानंतर योजना बंद होतील, या विरोधकांच्या टीकेवर फडणवीस यांनी, “राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मोफत वीज योजना यापैकी कोणतीही योजना बंद केलेली नाही. सर्व योजना सुरु आहेत. यापुढेही पुढील ५ वर्ष ही योजना सुरुच राहणार आहे”, असे सांगितले.
सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये मराठा साम्राज्यावर, हिंदवी साम्राज्यावर फक्त एक परिच्छेद होता. पण मुघलांचा इतिहास 17 पानांचा होता. पण आता हा इतिहास बदला असून सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा 21 पानांचा इतिहास अभ्यासक्रमात केंद्र सरकारने समाविष्ट केला असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
“महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य आहे, याबाबत संभ्रम ठेवण्याची गरज नाही. 106 हुतात्म्यांनी तयार केलेला हा संयुक्त महाराष्ट्र आहे. त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, तोडली जाईल. निवडणुका आल्या की अशा चर्चा होत असतात. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे, जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई ही महाराष्ट्राचीच राहील. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, त्यांच्या तत्त्वाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गाने महाराष्ट्र चालत राहील,” असेही फडणवीस म्हणाले.





