एकनाथ शिंदे-अजितदादांनी चौकशीच्या भीतीनं गुडघे टेकले; सामनातून टीकास्त्र

मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजितदादांनी असा निर्णय का घेतला? असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला. तेव्हा राज्याच्या विकासासाठी आपण युतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, यावरून सामनातून टीका करण्यात आली आहे. अजितदादांचा विकास! या शिर्षकाचा आज सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.
सामनातून नेमकं काय म्हटलं?
शनिवारी बारामतीत अजित पवार यांचे जंगी स्वागत झाले. बारामतीच्या होमग्राऊंडवर अशा स्वागताचा थाटमाट करून घ्यावा असे अजित पवार यांना का वाटावे? आतापर्यंत किमान चारवेळा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले व शरद पवार यांच्या कृपेने त्यांना ही सर्व सत्तेची पदे मिळत गेली. त्यावेळी अजितदादांनी होमग्राऊंडवर स्वतःचे अशा पद्धतीने स्वागत करून घेतल्याचे दिसले नाही. पण भाजपच्या पलंगावर गेल्यापासून अजित पवारांना सत्काराचे वेड जडले आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
हेही वाचा – Neeraj Chopra : गोड्लन बॉय नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी!
अजित पवार जर प्रामाणिक, स्वाभिमानी राजकारणी असते तर काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी स्वतःचा नवीन जागतिक पक्ष स्थापन करून वेगळे राजकारण केले असते, पण अजित पवारांना सर्वच आयते मिळाले. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपने जे अचाट, पण बुळेगिरीचे काम करून घेतले तेच काम अजित पवारांकडून करून घेतले. मुळात शिवसेना ही जशी मिंधे गटाची नाही तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अजित पवार गटाचा नाही, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.





