अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार? देवेंद्र फडणवीस म्हणाले..

मुंबई | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भारतीय जनता पक्षांत प्राथमिक सदस्यत्व अशोक चव्हाणांनी स्वीकारलं. दरम्यान, अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आमच्या सर्वांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्त्व, अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभा, देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रिपदे ज्यांनी भुषविली आणि दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकिर्द आपल्याला पाहायला मिळाली, असे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करतो की त्यांनी अशोक चव्हाणांच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर सही करून पक्षात रितसर प्रवेश द्यावा.
हेही वाचा – काँग्रेसला मोठा धक्का! अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश
सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये अशोक चव्हाण, अमर राजूरकर यांचं स्वागत करतो. निश्चितच त्यांच्यासारख्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपाची आणि महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे, याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही. आज आपण पातोय की देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्णत्त्वाकडे नेण्याचं काम केलं, जो बदल आणि परिवर्तन भारतात दिसायला लागला, त्यामुळे देशभरातील अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशातील मुख्य प्रवाहातील लोकांबरोबर काम करावं, मोदींसारख्या नेतृत्त्वाखाली काम करावं, देशाला पुढे नेण्याच्या मोदींच्या प्रयत्नांत आपणही वाटा उचलावा अशा प्रकारचा विचार अनेकांमध्ये आला. त्यामुळे प्रमुख नेतृत्त्व म्हणून आपण अशोक चव्हाणांकडे पाहू शकतो. अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी एवढंच सांगितलं आहे की विकासाच्या मुख्यधारेत योगदान देण्याची संधी द्या, मला पदाची कोणतीही लालसा नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अशोक चव्हाण दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यामुळे त्यांची काय जबाबदारी असणार हे केंद्रीय पातळीवर ठरवलं जाणार आहे. कारण अशोक चव्हाणांचं भाजपात येणं हे महाराष्ट्राच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहेच, पण त्यांच्याबाबतचा निर्णय केंद्रीय भाजपाकडूनच घेतला जाईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.





