काँग्रेसला मोठा धक्का! अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश
मुंबई | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपात प्रवेश केला.
अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आलं आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदं ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करत आहेत. मी सर्वात आधी भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती यांना अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आहे त्यावर सही करुन त्यांना भाजपात प्रवेश द्यावा.
हेही वाचा – भाजपा प्रवेशावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण; म्हणाले..
#WATCH | Former Maharashtra CM Ashok Chavan joins the BJP at the party's office in Mumbai. He recently quit Congress.
Former Congress MLC Amar Rajurkar also joined the BJP. pic.twitter.com/2833wY76am
— ANI (@ANI) February 13, 2024
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला आशिष शेलार यांचा उल्लेख करताना मुंबई भाजपचे अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला. यावर बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काँग्रेस नव्हे भाजपचे अध्यक्ष, अशी आठवण करुन दिली.
मी ३८ वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आज नवीन सुरुवात करत आहे. विकासाच्या राजकारणाला आम्ही नेहमीच साथ दिली. देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आम्हाला सकारात्मक साथ दिली. मी आजपर्यंत काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम केले. यापुढे प्रामाणिकपणे भाजपचे काम करेन. राज्यात भाजपला अधिकाअधिक जागा कशा मिळतील, यासाठी मी प्रयत्न करेन. मी कोणावरही व्यक्तिगत टीका किंवा दोषारोप करणार नाही. पंतप्रधान मोदी देशाचा सबका साथ, सबका विकास करत आहेत. पक्षाकडून मला जे सांगितले जाईल, ते काम मी करेल. काँग्रेस पक्ष सोडणे हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मी कोणालाही माझ्यासोबत येण्यास सांगितलेले नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.