क्लस्टरमुळे विकासाला वेग, मेट्रो आणि नव्या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार; ठाण्याला आधुनिक शहर बनवण्याचा संकल्प

ठाणे : महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहरातील रस्ते, उद्याने, पाणीपुरवठा आणि इतर प्रकल्पांना वेग आला आहे. त्यामुळे ठाणे वेगाने बदलत आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ठाण्यातील क्लस्टर योजनेमुळे विकासाला वेग मिळणार आहे. तसेच मेट्रो आणि नव्या प्रकल्पांमुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे असंही शिंदे म्हणाले. ठाणे शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे सर्वांसाठी खुले केले तसेच पाणी हा नागरिकांचा हक्क आहे, तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मनोरमा नगरातील सर्व रहिवाशांना घरांच्या चाव्या मिळतील तो दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी 20 लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्योतिबा मंदिर हॉल, मैदान, भाषिक सभागृह, UPSC-MPSC अभ्यासिका, विविध उद्याने आणि सेंट्रल पार्क अशा कामांचा समावेश होता.
हेही वाचा – संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
ठाण्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ठाणे–बोरिवली टनेल, रिंग मेट्रो, घोडबंदर रोडवरील कामे, तसेच वडाळा–ठाणे मेट्रोसह शहरातील मेट्रो विस्तार या प्रकल्पांमुळे ठाणे–मुंबई जोडणी अधिक वेगवान आणि सुलभ होणार असून प्रवासाची वेळ 15–20 मिनिटांवर येईल
क्लस्टर विकास योजनेबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, 2011 ते 2022 पर्यंतचे पात्र धारक नागरिक बेघर होणार नाहीत. जिथे सध्या नागरिक राहतात त्याच परिसरात त्यांना आधुनिक सोयीसुविधांनी युक्त घरे मिळणार आहेत. मोठे रस्ते, गार्डन, ग्राउंड, आरोग्य व शैक्षणिक सुविधा अशा सर्व अॅमिनिटीजसह सेल्फ-कन्टेन्ड ब्लॉक उभारले जातील. वागळे इस्टेट, घाटकोपर, रमाबाई आंबेडकर नगर यांसह अनेक ठिकाणी क्लस्टर प्रकल्प जलद गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकांचा विश्वास हीच आमची ताकद आहे. कोणाच्याही दिशाभूल करणाऱ्या बोलण्याला बळी पडू नका. नागरिकांना दर्जेदार घरे, योग्य भाडे, आणि वेळेत पर्यायी व्यवस्था देणे ही आमची जबाबदारी आहे. ठाणे महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहरातील रस्ते, उद्याने, पाणीपुरवठा आणि इतर प्रकल्पांना वेग आला असून ठाणे वेगाने बदलत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.





