अर्ज मागे घेतले नाही तर पक्षाचे दरवाजे बंद; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

ChandraShekhar Bawankule | एका मतदारसंघातून एक व्यक्तीच उमेदवारी अर्ज भरू शकतो. भाजपचे जे नाराज उमेदवार आहेत ते सगळे आपले अर्ज मागे घेतील असा विश्वास आहे. एखाद दोन ठिकाणी अडचण होऊ शकते. मात्र, पक्षाच्या विरोधात जाऊ नका, अशी विनंती महायुतीच्या बंडखोरांना आम्ही केली आहे. त्यानंतरही अर्ज मागे घेतले नाही तर कारवाई केली जाईल व पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होतील, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपचे जे बंडखोर उमेदवार आहेत अशा पदाधिकाऱ्यांना निवडणूक संचालन समितीने अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत अर्ज मागे न घेणाऱ्यांच्या विरोधात पक्षाकडून कारवाई केली जाईल. महायुतीमध्ये बहुतांश बंडखोरांची समजूत काढण्यात यश आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – आमदार महेश लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली : माजी महापौर मंगला कदम
महाविकास आघाडीकडे निवडणुकीत आता काही मुद्दे राहिले नाहीत. विकासाबद्दल ते बोलू शकत नाही. राहुल गांधी यांची नागपुरात सभा असली तरी या ठिकाणी येऊन ते मताच्या राजकारणासाठी खोटारडेपणा करतील. त्यांचा खोटारडेपणा आम्ही खोडून काढणार आहोत, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.





