खरातसारखी प्रकरणं राजकारणाच्या सोयीनुसार बाहेर येतात; राज ठाकरे

मुंबई | महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून नवनवे धक्कादायक आरोप समोर येत आहेत. भविष्य सांगण्याच्या किंवा सल्ला देण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. याशिवाय काही आर्थिक व्यवहारांमध्येही त्याचा सहभाग असल्याची माहिती पुढे आल्याने तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्यासह काही राजकीय नेत्यांचा अशोक खरातशी संपर्क असल्याचे आरोप झाल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी या प्रकरणावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंनी अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करत महाराष्ट्रातलं सध्याचं चित्र चांगलं नसल्याचं म्हटलं. “हा तोच महाराष्ट्र आहे का मला प्रश्नच पडतो. कुठे तो साधूसंतांचा महाराष्ट्र, कुठे आमचे गाडगे महाराज आणि आजची अवस्था काय आहे? शेताला पाणी नाही पण खरातला पाणी आहे. कोणतरी खरात कुठूनतरी आलाय. शेताला पाणी मिळत नाही, आमच्याकडे सिंचनाची बोंब आणि खरातला पाणी मिळतंय. हे बाबा आमचे. ही महाराष्ट्राची अवस्था”, असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेत आर वैशालीचा ऐतिहासिक विजय; १५ वर्षांनंतर भारतीय महिला जागतिक किताबाच्या लढतीत
“ही प्रकरणंही राजकारणाच्या सोयीनेच बाहेर येतात. वाईट म्हणून बाहेर येत नाहीत. आता कुणाचीतरी बत्ती लावायची. कुणाचीतरी वाट लावायची यासाठी ठेवणीतल्या गोष्टी अशा वेळी बाहेर काढायच्या. हे काही महाराष्ट्रासाठी चांगलं चित्र नाहीये. आशा करुयात भविष्यात ते लवकरात लवकर सुधरेल”, असंही राज ठाकरे म्हणाले.





