Budget 2023: पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री सीतारमण यांचे अभिनंदन ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदें
![Budget 2023: Congratulations to Prime Minister Modi, Finance Minister Sitharaman: Chief Minister Eknath Shinde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Eknath-Shinde-670x470.jpg)
मुंबई ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते, कारण मोदी सरकार २.० चा हा अखरेचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू आहे, तर सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री सीतारमण यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले, “देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला या अर्थसंकल्पाद्वारे चालना मिळणार आहे, त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मनापासून अभिनंदन करतो.” याचबरोबर “रोजगारनिर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पाचे मी राज्याच्यावतीने मनापासून स्वागत करतो.” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. याशिवाय “देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मांडला. हा अर्थसंकल्प गरीबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी तसेच पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा अर्थसंकल्प आहे.” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
विरोधकांच्या टीकेला फडणवीसांकडून प्रत्युत्तर :
“विरोधकांनी सकाळीच हे ठरवलं होतं, की कसंही बजेट आलं तरी काय प्रतिक्रिया द्यायची. सकाळीच लिहून ठेवलं होतं. तीच स्क्रीप्ट ते वाचत आहेत. त्यांनी बजेट बघितलंही नाही, त्याचा अभ्यासही केला नाही. बजेटच्या मेरीटवरही ते बोलत नाहीत. कारण, मेरीट त्यांना पाहायचेच नाहीत. त्यांनी सकाळी जी प्रतिक्रिया ठरवली तीच प्रतिक्रिया त्यांना ऐकवायची आहे. म्हणून त्यांच्या प्रतिक्रियेवर मी प्रतिक्रिया द्यावी, एवढा त्या प्रतिक्रियेत दमच नाही.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.