Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘आषाढी पालखी सोहळा – २०२६ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीसाठी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून संत तुकाराम महाराज आणि सासवड येथील संत सोपानकाका संस्थानकडून पालखी सोहळ्याची मोठी परंपरा असून, याबरोबर राज्यातील इतर संताच्या पालखी सोहळा पुणे विभागात आल्यानंतर आज पर्यंतच्या परंपरेला साजेसा आणि वारकऱ्यांसाठी अधिक सुविधायुक्त सोहळा आयोजित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

आषाढी पालखी सोहळा-२०२६ च्या नियोजनाबाबत झुंबर हॉल, पुणे विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, विभागीय आयुक्त शितल तेली – उगले, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालखी सोहळ्यांशी संबंधित प्रमुख विश्वस्त, पालखी प्रमुख, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. दरवर्षी लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पार्श्वभूमीवर प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पालखी प्रमुखांनी बैठकीत मांडलेल्या सूचना आणि अडचणींची दखल घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

हेही वाचा –  ‘पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पावसाळ्याच्या कालावधीत वारी होत असल्याने पालखी मार्गावरील रस्ते, मुक्कामस्थळे आणि विसावा स्थळांवर चिखल होणार नाही यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्गावरील अपूर्ण कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.

वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालये, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्रे आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी. निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवून शौचालयांची नियमित स्वच्छता करावी. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, अन्नपदार्थांतील भेसळ रोखणे आणि आरोग्यविषयक उपाययोजनांवर विशेष भर देण्याचे निर्देश देत श्रीमती पवार म्हणाल्या की, आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी. चंद्रभागा नदी परिसरात आवश्यक तेथे बचाव पथके आणि नौकांची व्यवस्था करावी.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी मुक्कामस्थळांसह संपूर्ण पालखी मार्गावर पुरेसा बंदोबस्त ठेवावा. गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, छेडछाड, चोरी व अन्य गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत कमानी, फलक किंवा इतर संरचनांमुळे अपघात होणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. पालखी सोहळा विश्वस्त, दिंडी प्रमुख आणि स्थानिक प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय राहिल्यास सोहळा अधिक यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करून श्रीमती पवार यांनी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश केले.

बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेण्यात आली असून त्यानुसार आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच पुढील आढावा बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विभागीय आयुक्त शितल तेली – उगले यांनी मागच्या आठवड्यात तिन्ही जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गाची पाहणी करून सर्व सोय सुविधाची पाहणी केल्याचे सांगून जिथे जिथे कामं अपूर्ण आहेत, त्या कामाला गती देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. यावेळी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा दिला.

पैठण, मुक्ताईनगर, जळगाव ,कौडीन्यपूर, अमरावती येथून येणाऱ्या पालख्यांनी छत्रपती संभाजी नगर विभागातील सुविधा बाबतअशीच बैठक घेवून नियोजन करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तात्काळ छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त यांना फोन लावून या सर्वांची बैठक लावून यांच्या सर्व अडचणी सोडवाव्यात असे निर्देश दिले. त्यावेळी सर्व संस्थानच्या विश्वस्तानी आनंद व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button