आशिष शेलार राजकीय संन्यास कधी घेणार? ठाकरे गटातील नेत्याचा सवाल

मुंबई | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रात महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं भाजप नेते आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरून ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी टोला लगावला आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, आज त्यांना कळलं असेल की हे फार काळ चालत नाही. ते कधीतरी उघडकीस येतं आज त्याचे चटके त्यांना बसत आहेत. ४५ प्लस बोलले होते. आता ते दुसरे (आशिष शेलार) शांत आहेत, लपलेत कुठेतरी. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं ते म्हणाले होते. आता त्यांना विचारा की राजकारणातून ते कधी संन्यास घेणार? असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा – Pune | ससूनमधील डॉक्टरला पैसे पोहोचविणारे अटकेत
जनता आशिष शेलारांच्या संन्यासाची वाट पाहत आहे. अहंकाराने डबडबलेली ही लोक आहेत. वैचारिक व्यभिचारी, सामाजिक व्यभिचारी आणि आर्थिक व्यभिचार केला, त्याचं प्रतिक देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यावरही दोन व्यभिचारी आहेत. आमच्यांकडून जे गेले आणि त्यांना जे भेटले ते पण व्यभिचारी, असं अरविंद सावंत म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत.





